
खान्देश वार्ता-(धुळे)
जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरे परिसरात खून करून मृतदेह दोंडाईचा जवळ जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भा.न्या.सं. कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय परशुराम जाधव (वय ३५, रा. पिंपळगाव हरे तांडा, व्यवसाय – बैलांचा व्यापार) व त्याची पत्नी यांच्यावर विजय भिमा राठोड (रा. पिंपळगाव हरे तांडा) याचा खून केल्याचा आरोप आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरोपीने विजय राठोड याचा खून करून मृतदेह धुळे जिल्ह्यातील अंजनविहिरे (ता. दोंडाईचा) येथील पाटाच्या चारीजवळ आणून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी जाळल्याचा आरोप आहे. पुलाजवळ असलेल्या एका पाइपमध्ये मृतदेह जाळण्यात आल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याचा स्टाफ तसेच दोंडाईचा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जळालेल्या मृतदेहाचे अवशेष व हाडे शोधण्याचे काम सुरू आहे. या तपासासाठी धुळे पोलिसांकडून फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



