
खान्देश वार्ता-(धुळे)
हरियाणा राज्यातून गुजरात राज्यात ‘पुष्पा स्टाईलने’ खाद्यतेलाच्या टँकरमधून तस्करी होत असलेल्या विदेशी दारूच्या बॉटल भरलेले ४०० बॉक्स व टँकर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत जप्त केले आहे. या कारवाईत एकूण एक कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राजस्थानातील चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार(दि.१२ )रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हरियाणाहून खाद्यतेलाच्या टँकरमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची तस्करी गुजरातकडे होणार आहे. अशी माहिती प्राप्त झाली. या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा व नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी पथक तयार करून मुंबई आग्रा महामार्गावर आकांक्षा हॉटेलजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान टाटा कंपनीचा २२ चाकी टॅंकर (जीजे१२बी व्ही/५०१५) पोलिसांना दिसून आला.

चालकाची ओळख मोहनलाल पुरखाराम जाट (रा. बरेवालातला, जि.बाडमेर, राजस्थान) अशी झाली. चालकाने टँकरमधून खाद्यतेल असल्याचे सांगितले. मात्र संशय आल्याने पंचसमक्ष तपासणी केली असता टँकरच्या आत लोखंडी पत्राचे सहा गुप्त कप्पे तयार करून त्यांचे झाकण नट बोल्ट व वेल्डिंग ने घट्ट केलेले आढळले. यानंतर गॅस कटरने उघडल्यावर त्यातील चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू लपविल्याचे आढळले.
या कारवाईत या कारवाई ५५ लाख ९६ हजार २०० रुपये किंमतीची विदेशी दारूचे ४०० बॉक्स व ४५ लाख रुपये किंमतीचा टँकर असा एकूण एक कोटी ९६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित चालकाने हा माल खाद्यतेल असल्याचा भासवित जाणून-बुजून विनापरवाना विदेशी दारूची चोटी विक्री करण्यासाठी गुजरातकडे घेऊन जात असल्याचे कारवाईत स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, नरडाना पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे यांच्यासह गुन्हा शाखा व नरडाणा पोलीस ठाण्यातील पथकाने केली आहे.

दरम्यान धुळे जिल्हा पोलीस दलाने केलेली ही कारवाई कौतुकास्पद असून वरिष्ठ पातळीवर देखील या कारवाईचे कौतुक होत आहे. मात्र गुटखा तस्करी रोखतांना कारवाई केली जाते. त्यावेळी चालकाला व सह चालकाला ताब्यात घेतले जाते. त्यांच्यावर कारवाई केली. मात्र मुळापर्यंत अद्याप पोलीस दलाला पोहोचण्यात यश आलेले नाही. त्याचप्रमाणे या कारवाईत देखील हरियाणा ते गुजरात पर्यंतच्या मुळापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश येते का.? हा आता संशोधनाचा विषय आहे..?



