
खान्देश वार्ता-(धुळे)
पोलीस दलात गुन्हेगारीचा शिरकाव, हा तसा जुनाच मुद्दा आहे. पोलीस दलाकडे असलेली अनियंत्रित शक्ती आणि गुन्हेगारी जगताशी त्यांचा होणारा संपर्क हा पोलिसी पेशाचा भाग आहे. त्यामुळे यातून पोलीस दलातही गुन्हेगारी वाढली आहे. काही प्रकरणात ‘क्राइम ऑफ पॅशन’चा प्रकार आढळून आला आहे. पोलीस दलात संघटित गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही कायदा व सुव्यवस्थेसाठी चिंताजनक बाब मानली जात आहे. जिल्ह्यातील खाकीचे गुन्हेगारीकरण रोखण्याची आवश्यकता आहे.
बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सांगवी यांना आदिवासी प्रवाशांच्या आर्थिक लुटीप्रकरणी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनानंतर वाटमारी करणाऱ्या पोलिस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पैसे परत केले. पैसे परत केले म्हणून हे प्रकरण एवढ्यावर थाबंत नाही. पोलिस दलातील काहींना लागलेली वाटमारीची लत आणि त्यामुळे होत असलेला समस्त दलाचा विचका ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी वाटमारीचे अनेक अजरामर किस्से जिल्ह्यातील पोलिसांकडून घडलेले आहेत.
मात्र काहींचा सिनेमा रिलीज झाला तर काहींचा झाला नाही म्हणून ते साळसूद असल्यासारखे वावरत आहेत. सांगवी पोलिसांनी मूळ तक्रारदारास पैसे परत केले आहेत. सांगवीसह जिल्हाभरातील अनेक पोलीस ठाण्यातील काही पोलीस अशाच पद्धतीने प्रवांशांची कायम लूटमार करतात, हे सामान्य जनतेला लुटणारे पोलीस आहेत की चोर आहेत.? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष पुरवावे. कारवाई वैगेरेचा दंडुका आपल्या सहकाऱ्यांवर उगारावा. अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.